इमारतीने दाराला कुलूप लावीत निघून जाणं, मेणाच्या पहिल्या कढत ठिपक्याने सही करणं, किल्ल्या चघळत लठ्ठ कुलुपाने झोपाळ्यावर पडून राहणं, भारताच्या नकाशाने भिंतीवर हिसडे मारणं, अंगठीने डोळा घालणं, भिंतीने डावीकडे सरकणं, फ्लॉवरपॉटने गडबडा लोळणं, अशा विलक्षण चमकदार कल्पना मांडणारे कवी अरुण कोलटकर यांचा एक नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय... ................
एक नोव्हेंबर १९३२ रोजी कोल्हापूरमध्ये जन्मलेले अरुण कोलटकर हे मराठीबरोबरच इंग्लिशमधून कविता करणारे साहित्य अकादमी पारितोषिक विजेते नवकवी. त्यांची कविता ही नेहमीपेक्षा वेगळी वाट चोखळणारी आणि महानगरीय संवेदनेचा व्यापक आणि विनाशकारी आविष्कार असणारी मानली गेली.
त्यांच्या मराठी कविता ‘असो’, ‘शब्द’, ‘अथर्व’ यांसारख्या काही अनियतकालिकांमधून आणि ‘सत्यकथा’, ‘युगवाणी’ यांसारख्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत गेल्या. त्यांच्या इंग्लिश कविता ‘पोएट्री इंडिया’, ‘ओपिनिअन’, ‘लिटररी क्वार्टर्ली’ आणि ‘डेबोनेअर’सारख्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या कवितेतल्या प्रतिमांचा वापर विलक्षण...
सूर्याचा आरक्त नारळ फुटतो
पृथ्वीचे तारू नांगर उचलते
आणि घसरते रात्रीच्या सागरात
श्वासखीळ बसलेल्या मध्यरात्री
या जिभेच्या शेजेवर
माझा एकांत आहे
अगतिकतेशी .....
त्यांच्या ‘जेजुरी’ काव्यसंग्रहाला राष्ट्रकुल पारितोषिक मिळाले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार आणि बहिणाबाई प्रतिष्ठानचा पुरस्कार असे सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.
कॅगच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये सामील होण्याचा मान मिळालेले ते एक उत्कृष्ट आर्ट डायरेक्टर होते.
भिजकी वही, चिरीमिरी, द्रोण, जेजुरी, अरुण कोलाटकरांची कविता, Kala Ghoda Poems, The Boatride and other Poems, The Policeman - अशी त्यांची पुस्तकं गाजली आहेत.
२५ सप्टेंबर २००४ रोजी त्यांचा पुण्यामध्ये मृत्यू झाला.
(अरुण कोलटकरांची पुस्तकं बुकगंगा डॉट कॉम वरून मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.)